धना भाग २०

”धना”

भाग २० वा (अंतिम)

धनाच्या हृदयाची कंपने अतितीव्र झाली होती,सावध होऊन बंदुकीत बार ठासायाला वेळच नव्हता,राजलक्ष्मी धनाच्या काळजीने अधीर झाली.


नशिबाने कित्येक दिवसांनी त्याची भेट घडवली होती,पण काही क्षणात आता धना कधीच दिसणार नाही अशी परिस्थिती आली होती.तिचे काळीज फाटू लागले.
३-४ वाघ गुरगुरत धनाच्या जवळ येऊ लागले.


धनाने केवळ बंदूक पुढे धरून कमरेत काहीसा वाकून वाघांच्या समोर उभा होती ….धनाला काही करावे सुचेना.


एक एक पाउल मागे येत त्याने जगदंबेचे स्मरण केले …आई भवानी केवळ तुझ्या आशीर्वादाने मी आजवर तरलो,पण आता साक्षात मरण पुढे उभे आहे असे वाटू लागले ..पाठीमागे माझी जिवलग जिच्यासाठी आजवर आटापिटा केला आणि पुढे मृत्यू….विलक्षण अश्या कात्रित धनाला नाशिबाने अड़कवले होते आणि काही निमिशात ही कात्री सर्वकाही कापनार होती…!


वाघ आता झेपेच्या पवित्र्यात आली आणि झेप घेणार धनाने लढायचा पवित्रा घेतला पण मन राजलक्ष्मी कड़े ओढ़त होते..तिच्या मिठिसाठी अधीर होते..फक्त एक घट्ट मीठी आणि परत मरण आले जरी चालले असते…जर त्या वाघाना मानवी भाषा समजत असती तर धनाने नक्कीच त्याना सांगितले असते..अरे थांबा एक क्षण..मला माझ्या प्राणप्रिय प्रेयसीची केवळ एक झलक पाहुद्या..मग खुशाल तुमच्या कराल जबडयात हां धना स्वताहून आपली मान देईल…पण हे अशक्य होते…नियतीची मर्जी…..!


इतक्यात जंगलातून धडा धड गोळ्यांचे बार वाघांच्या दिशेने येऊ लागले …मातीत गोळ्या आपटून माती फुटू उडू लागली ..एकाच वेळी १०-१२ गोळ्या वाघांच्या पायात घुसू लागल्या आणि वाघांनी आपला जीव धोक्यात आहे हे ओळखून मागे काढता पाय घेतला.
धनाने प्रसंगावधान राखले आणि झटक्यात मागे वळून राजलक्ष्मी कडे आला..!


त्याला सेकंदाच्या ही आत ही संधी साधायची होती..जणु जगदंबेनीच झुकते माप धनाच्या झोळीत टाकले होते.
त्वरेने राजलक्ष्मी चा हात धरून बाजूच्या जंगलात गेला .
त्याने राजलक्ष्मी चा हात घट्ट धरला होता,त्याची त्याला जाणीव झाली.
राजलक्ष्मी हुंदके देत धनाच्या मिठीत पडली ,सूर्याजीने बंदूक टाकली आणि आवेगाने राजलक्ष्मी ला मिठीत घेतेले आणि काही क्षण निशब्द संवाद सुरु झाले.
अश्रूंचा आणि हुंदक्यांना मर्यादा संपल्या.
बेभान होऊन दोघेही जन्मोजन्मीच्या विरहानंतर पुन्हा भेटावेत असे भेटत होते..!
धनाने मिठी काहीशी ढिली केली आणि आपल्या हाताने राजलक्ष्मीचे अश्रू पुसू लागला..!
किती विलक्षण क्षण असेल हो हा ?


नशीब किती परीक्षा घेतो जिवलगांच्या भेटीच्या,जणूकाही परीक्षाच घेत असतो कि नाशिबाच्या पुढे यांचे प्रेम टिकून राहील का ?
पण धना आणि राजलक्ष्मी दोघांनीही नशिबाला हारवले होते.
आता केवळ विजय होता …!
निर्धारी शब्दात …राजलक्ष्मीने धनाला म्हणाली ..आता माझा मृत्यू फक्त आणि फक्त तुमच्या मांडीवर व्हावा.मला आता तुमच्याशिवाय जिने नको आहे..!


धनाने व राजलक्ष्मी पुन्हा घट्ट मिठीत विसावाली आणि क्षणात धना भानावर आला कि काही क्षणापूर्वीच आपण भुकेल्या वाघांच्या तावडीतून कसे निसटलो ?
पलीकडच्या जंगलातून १०/१२ सैनिक आणि सोबत सूर्याजीराव जखमी अवस्थेत पुढे येत होते
यानीच जंगलातून गोळ्यांचा पाउस सुरु केला आणि आपण बचावलो..!


धनाला याची जाणीव झाली.
त्याने पटदिशी राजलक्ष्मीची मिठी सोडवली आणि खाली पडलेल्या बंदुकीत पुन्हा दोन काडतुसे भरली आणि सावधपणे समोरच्या जंगलात पाहू लागला .

समोरच्या जंगलातून १०/१२ बंदुकधारी व सैनिकी वेशातील सूर्याजी दिसला.
सूर्याजीला पाहताच राजलक्ष्मी म्हणाली ….सूर्याजीराव आपल्या दोघांची भेट घडवून देण्यासाठीच इथवर आले आहेत ..!
काय ? धना प्रश्नार्थक मुद्रेने बोलला ..!


होय,त्यांनी मला इथे फक्त तुम्हाला सपुर्द करण्यासाठी आणले आहे.
हे ऐकताच धना म्हणाला ,कसे शक्य आहे राजलक्ष्मी ?
एवढी हजारांची फौज घेऊन आपली भेट कशी घडू शकली असती ,केवळ आपल्या प्रेमाची ताकद म्हणून आज आपण एकमेकासमोर आहोत.


मला पुन्हा एकदा तुला नाही हरवायचे असे म्हणत धनाने राजलक्ष्मी चा हात धरला आणि गुप्त वाटेने किल्ल्याकडे जायला निघाला ..!
राजलक्ष्मी आपण किल्ल्यात जावू..तिथे बऱ्याच गुप्तवाटा आहेत ..तिथून आपण निसटून जाऊ..पुढे सुरक्षित ठिकाण पाहून ठरवूया पुढे काय करायचे ते ??
आणि धना लगबगीने जायला निघाला.


पाठीमागून सूर्याजी राजलक्ष्मी आणि धना ला हाक मारू लागला होता ,त्याच्या हाका कानावर पडून देखील दोघे बेफान होऊन किल्ल्याकडे दौडत होते…!

सेनापती आणि शेलार मामा जवानांच्या हल्ल्यातून कसेबसे बचावले आणि त्यांच्या गुप्तवाटेला लागले होते ,मामानी सेनापतीला प्रश्न केला कि ..सेनापती धना कुठे आहे ?
सेनापती उत्तरले ….मामा काळजी नसावी ..धना किल्ल्यामार्गे पुन्हा गुप्तवाटेने कोकणात उतरेल….!

काय ????

मामांच्या भुवया उंचावल्या …ते स्तब्ध होऊन बोलले ..अरे काय हे केले हे त्याने ?
धना का पुन्हा गेला किल्ल्याकडे …तुम्हाला माहिती नाही पण किल्ला आता काही क्षणात आसमंतात उडून संपून जाईल..आम्ही तिथे स्फोटके पेरेली आहेत ,कारण जरी सैन्य आत शिरले तरी त्यांना संघटनेचे काहीच गुपिते सापडू नयेत म्हणून….!
मूर्खपणा केला तुम्ही..आता होता होईल तितल्या लवकर धानापर्यंत पोहचायला हवे ..असे म्हणत शेलार मामा आणि सेनापती पुन्हा किल्ल्याकडे दौडू लागली.

इकडे गावकरी,पाटील व इतर मंडळी सैन्याला शरण आली होती.
आम्ही सुर्याजीरावांच्या बरोबर गुप्त मोहिमेवर आहोत एवढेच सैन्यातील अधिकार्यांनी त्यांना सांगितले होते.गावकरी सैन्याच्या सोबत येऊ शकत नाहीत असे सांगून अधिकार्यांनी त्यांची शस्त्रे काढून घेतली..!
आणि सैन्यातीक तुकड्या ठरल्याप्रमाणे पुन्हा किल्ल्याकडे दौडू लागल्या.

सैन्याने सुर्याजीरावना गाठून सदर हल्ला गावकर्यांनी केला होता असे सांगितले.
सुर्याजीनी वस्ताद आणि पाटलांना बोलावून घेतले .झालेली सर्व हकीकत सांगितली आणि धना आणि राजलक्ष्मी पुढच्या जंगलात गेली असल्याचे सांगितले..!
सूर्याजीने एक काम तर केले होते कि त्याची इच्छा होती कि धना आणि राजलक्ष्मी भेटावेत …आता उरले होते कर्तव्य ..!
करारी आवाजात सूर्याजीने सर्वाना आदेश दिले कि धना ज्या व्यक्तीसोबत पाटलांची मुलगी आहे त्याना गोळी मारू नये …इतरांना सोडू नये..!
समोरच्या जंगलापलीकडे त्या दरोडेखोर लोकांचा अड्डा आहे ,तो नष्ट करून येण्याचे आदेश आपल्याला वरीष्ठांनी दिले आहेत.
आता खर्या लढाईला प्रारंभ होईल,असे म्हणत सूर्याजी व सारी फौज किल्ल्याकडे चालू लागली.

धना आणि राजलक्ष्मी सुध्दा किल्ल्याकडे दौडत होती आणि दुरून हाकेच्या अंतरावर किल्ला दृष्टीस पडला..!
धापा टाकत दोघेही किल्ल्याकडे जाऊ लागली.

इकडे गुप्त चोरवाटेने शेलार मामा आणि सेनापती धनाकडे किल्ल्याच्या मार्गाला जाऊ लागली.
मामा विचार करत होते कि जवळपास ३ तास उलटून गेले आहेत,आता काही क्षणात वेळ नियोजित स्फोट होणार …आता धावत पळत जाऊन धना ला वाचवणे काही केल्या शक्य नाही ,तेव्हा त्यांनी सेनापतीला सांगितले कि उंच झाडावर चढून आपल्या संघटनेचा धोक्याची सुचना देणारा सांकेतिक आवाज काढ ..आता याशिवाय पर्याय नाही.


हे ऐकताच सेनापती सरसर एका उंच झाडावर चढला ..आणि एक गुप्त सांकेतिक आवाज जो केवळ संघटनेच्या लोकांनाच माहिती असे आणि तो आवाज म्हणजे धोक्याची सूचना आहे असे सर्वाना माहिती होत असे असा आवाज काढायला सुरवात केली ……….!!!!!

धापा टाकत असलेल्या धनाला हा आवाज कानी पडला आणि त्याचे धावते पाय थांबले ..केवळ काही अंतरावर किल्ल्याचे प्रवेशद्वार होते.
का थांबला….श्वासांचे उसासे टाकत राजलक्ष्मी बोलली….!
हा धोक्याचा आवाज आहे राजलक्ष्मी ..नक्कीच काहीतरी धोका आहे म्हणून माझे साथीदार मला हे आवाज देऊन सूचित करत आहेत …!
पण नेमका धोका काय असावा ?
धना विचार करू लागला इतक्यात पाठीमागून सूर्याजीची सेना दिसू लागली.


सूर्याजीने धना आणि राजलक्ष्मीला पाहिले ….सेनेला आधीच आदेश होते कि याना गोळी घालू नये …सूर्याजीने धनाला मोठ्या आवाजात सुचना दिली……धना तुम्ही आमच्या बंदुकीच्या इशार्यावर आहात ….कृपा करून शरण या …मी वचन देतो कि तुमचे लग्न लावून देऊ …!
मला,गावकार्याना तुझी गरज आहे.
सूर्याजीचा आवाज कानी पडताच धना राजलक्ष्मीकडे पाहू लागला…!


राजलक्ष्मीने धना चा हात पकडला ,आता मात्र राज लक्ष्मी कोणताही धोका घेण्याच्या मनस्थितित नव्हती..ती धनाचा हात पकडून किल्ल्याकडे धावू लागली ..धनाची बंदूक खांद्याला लटकत होती ……इकडे सेनापती मोठ्या रवाने धोक्याचा आवाज धनापर्यंत पोहचावेत होते ..पण धनाला ते ऐकू येऊनही काही फायदा नव्हता….!!
आता जगायचे मरायचे ते राजलक्ष्मी सोबत..!

धना आणि राजलक्ष्मी किल्ल्याच्या आत प्रवेशली..!
काही क्षण भुतकाळात विलीन झाले.
सूर्याजीने किल्ल्यात प्रवेश करायची योजना सर्व सेनेला सांगितली आणि ,सर्वानी बंदुका सरसावल्या आणि सारी सेना किल्ल्याकडे जायला धावली ……
इतक्यात धडाड …..धड …धड …धड़

करत तो प्रचंड किल्ला आसमंतात उडून गेला…ज्वालेचे प्रचंड लोळ आभाळात उमटले ..मोठमोठ्या शिळ्या गुलाल उधळावा तश्या क्षितिजावर फेकल्या गेल्या ..या ज्वालेच्या उष्णतेने किल्ल्याकडे धावत असलेली सेना क्षणात मागे फिरली आणि जीव वाचवू लागली ….स्फोटामागे स्फोट अशी जणू मालिकाच सुरु झाली..!


आगीच्या प्रकाशात सुर्याजी मागे हटत होता आणि त्याच्या डोळ्यातून आश्रु वाहू लागले होते …त्याने गगनभेदी किंचाळी केली…धना..!!
कधी नव्हे एवढे दुख त्याच्या काळजाला चिरत होते..!
धाय मोकलून तो रडू लागला….!


उंच झाडावर असलेल्या सेनापतीला त्या आगीचे प्रचंड तांडव दिसले आणि तो खाली उतरला ….मामा आणि ते दोघेही चिंताग्रस्त झाले आणि गुप्त वाटेने तेही पसार झाले …दोघांच्या मनात मोठा प्रश्न होता ..कि धना …काय झाले असेल त्याचे देव जाणे ….!!
मामा मोठे काळीज करुन बोलले..जगला तर आपला..आणि नाही तर आई भवानीचा..चला आपण चुकायला नको,त्वरेने महाराष्ट्र सोडला पाहिजे.

सुर्याजीच्या अश्रूचा बांध फुटला होता ..पाटील ,वस्ताद दोघेही गहिवरून रडत होते आणि सारी सेना पुन्हा हताश होऊन कोल्हापूरच्या रस्त्याला लागली होती..!

दिवस उजाडला …उजाडलेल्या किल्ल्याच्या अवशेषात वनअधिकारी /पोलीस यंत्रणा तपास करू लागले ..केवळ दगड आणि कोळसा याखेरीज काहीच दिसत नव्हते..!
एका दगडांच्या ढिगाबाजूला एक बंदूक काळीकुट्ट होऊन जळून पडली होती..!
लंगडत लंगडत सूर्याजी तिथे आला आणि गुडघे टेकून रडू लागला..!


त्याच्याकडे शब्द नव्हते या प्रेमाला उपमा द्यायला ..!
जी काही गुपिते होती ती धना आणि राजलक्ष्मीच्या सोबत जळून खाक झाली होती …..खिन्न मनाने सूर्याजी व सारे पथक कोल्हापूरला परतले..!

धनाच्या गावात रडारड सुरु झाली ..गावावर शोककळा पसरली होती.
धना आणि राजलक्ष्मी ने एक नवाच इतिहास घडवला होता..!
धना आणि राजलक्ष्मी दोघेही अमर झाली होती.
बघता बघता सहा महीने लोटली.
आजही गावात कोणी लग्न केले तर जिथे धनाची बंदूक सापडली त्या दगडी कातळात तिथे जाऊन दर्शन घेऊन गावातील नवदाम्पत्य संसार सुरु करत असे..!


त्या जागेला सार्या पंचक्रोशीत “धना” चे ठाणे नाव पाडले होते.
अनेक नवे मल्ल मोठ्या कुस्तीला जायच्या आधी धना व राजलक्ष्मी जिथे संपली त्या “धना” च्या ठाण्यात खणा नारळाने ओटी भरून मगच कुस्ती लढत असे ..!


कित्येक प्रेम करणारी युगले त्या काळ्या दगडात असलेल्या “धना राजलक्ष्मी” ला नवस करत असे कि त्यांचे प्रेम यशस्वी होऊदे आणि चमत्कार असा कि त्यांचे प्रेम यशस्वी होत असे ….!
धना आणि राजलक्ष्मी हे कधीच एक होऊ शकले नाहीत ..मात्र एकत्र मरू मात्र शकले होते.


धनाने संघटनेचे गुपित कोणालाच कळू दिले नाही ….आणि मीही आजवर कोणाला बोललो नाही …..!

डायरीच्या पानावर निशिगंधाचे अश्रू पडले ….राजनंदिनी रडत रडत सारे ऐकत होती..!
डायरीचे पुढचे पान पल्टायची इच्छा तिची होत नव्हती..!

एव्हाना दिवस उजाडून गेला होता ..दोघीही आवरून कुठेतरी निघाल्या होता…निशिगंधा आणि राजनंदिनी त्यांच्या कार मधून कुठे निघाल्या होत्या ?
त्या दोघींच्या डोळ्यात दिसत होते “धना ” च्या ठाण्याकडे

मार्ग विचारात विचारात त्या “धना” च्या ठाण्या पर्यंत पोहचल्या.
अनेक कोल्हापूरचे पैलवान हात जोडून काहीतरी मागणे मागत होते.


तर काही प्रेमीयुगल प्रेमाचे यश धना ला मागत होते ..आणि ती युगले एकमेकांच्या मिठीत मोठ्या विश्वासाने विसावत होती कि आता धना आपले प्रेम यशस्वी करणार …!
त्या दोघीही गुडघे टेकून खाली बसल्या …त्यांचे अश्रू आता लपत नव्हते ..धाय मोकलून त्या रडू लागल्या होत्या ..!
काय विलक्षण इतिहास घडला होता या मातीत.
धनाचे ठाणे आता बऱ्यापैकी पर्यटन स्थळ झाले होते.


निशिगंधा व राजनंदिनी दोघींना धना आणि राजलक्ष्मी स्पष्ट दिसत होती ….गळ्यात गोळ्यांचा पट्टा आणि बंदूक अडकवलेला धिप्पाड धना आणि कोमल,नाजूक आणि सौंदर्यवती राजलक्ष्मी …
अश्रुंचा अभिषेक सुरु झाला.
भरल्या नयनांनी त्या पुन्हा वाड्यावर आल्या …..!!

जेवणात दोघींचे लक्ष नव्हते,दोघी एकमेकांशी बोलत पण नव्हत्या ..!
“आई…पुढे काय झाले ग ?”

राजनंदिनी च्या बोलण्याने निशिगंधा ला आठवले कि डायरीचे एक पान वाचायचे राहिले आहे…..
त्वरीत निशिगंधाने डायरी हातात घेतली आणि पुढचे एक पान वाचू लागली…

धना आणि राजलक्ष्मी च्या जाण्याने माझ्या आयुष्यात पुन्हा दुखाने वेधून टाकले.
किल्ल्यातील इतर सहकारी कुठे गेली ?
त्यांचे परत काय झाले असावे अश्या विचाराने मी पुन्हा चिंताग्रस्त झालो.
या सार्या प्रकारात एक दिवस माझ्या हातात राजस्थान ला माझी बढ़ती होऊन बदली झाल्याचे पत्र पडले.
खिन्न मनाने मी राजस्थान ला जायला निघालो.


धनाचे गावकरी मला जाऊन देत नव्हते ..पण मोठ्या निश्चयाने मी जायचे ठरवले होते.
धना आणि राजलक्ष्मी ला विसरण्याचे हेच माध्यम होते….!
मी राजस्थान ला गेलो काही दिवसातच तिथे रुळलो,.!


माझा कुस्तीचा नाद काही कमी होत नव्हता,या दुखाच्या काळात कुस्तीने मला तारले,जीवन्त ठेवले.
वेळ मिळेल तसा मी भागातील कुस्त्या पहायला जात असे ,तिथली पैलवान मंडळी मला पंजाब,दिल्ली ला कुस्त्याला बोलावत असे…..!
मला मनोमन वाटे कि माझ्या इतका कुस्ती शौकीन जगात दुसरा नसेल ….!


आणि क्षणात डोळ्यात पाणी येई आणि धना आठवे …माझे कुस्तीप्रेम काहीच नाही …धना आज असता तर काय माहिती कोणाच्या वेशात कुस्ती खेळून कुस्ती जिवंत ठेवली असती…!
दिसामागुन दिवस जात होते…

आणि एके दिवशी दिल्लीच्या एका मोठ्या कुस्ती मैदानात एक प्रमुख कुस्ती लागली ….आणि मला ते निर्धारी डोळे दिसले आणि माझे रोमरोम थरकापू लागले ..माझ्या घसा सुकू लागला …..दिल्लीच्या एका प्रसिध्द मल्लाला ढाक लावून विजयी आरोळी देणारा तो मल्ल जणू धना भासत होता …भासत होता ?
नव्हे नव्हे तो माझा धनाच होता …माझा धनाच होता ….!!!!

समाप्त

8 thoughts on “धना भाग २०”

  1. कुठल्याही गोष्टीचा शेवट/अंत हा खरं तर त्या पूर्ण गोष्टीला रंगवुन जातो, पण इथे शेवट काय आहे आपण जेव्हा पोस्ट टाकतो तेव्हा हे पाहायचे जरूरी आहे की ती आपण व्यवस्थित टाकली आहे का, पण इथे काय कुठे चालले आहे समजत नाहिये, त्यामुळे जरी पूर्ण गोष्ट ही खूप चांगली जरी असली पण तिचा शेवट जर डळमळीत पने प्रस्तुत केला असेल तर त्या गोष्टीला कवडीचीही किंमत राहत नाही.

  2. अरेरे इतक्या चांगल्या गोष्टीचा इतका अपूर्ण शेवट, त्यापेक्षा ती गोष्टच न वाचलेली बरी 😔😔🤐

  3. Vinod Vishwas Mhatre

    अप्रतिम प्रेम कथा, कुस्ती ची आवड वाढवणारी कथा, महाराष्ट्राच्या मातीची कथा

  4. पूर्ण गोष्ट वाचली एवढा खराब शेवट मी कुठल्याच कथा-कादंबरी पाहिला नाही

  5. Sachin R Purane

    अप्रतिम शब्दांकन…
    लेखक आणि प्रकाशक यांचे आभार मानावे तितके कमीच आहे…
    आज पुन्हा एकदा प्रेम आणि प्रेमाची महती मनाच्या गाभाऱ्यात हुंदका देवून गेली…

  6. हरीश सावंत

    जसं इतरांनी सांगितलं की शेवट बरोबर नव्हता त्याला मी पण सहमत आहे कारण पूर्ण गोष्ट एवढी चांगली आहे आणि शेवट मात्र असं नको असायला होता जर तो मल्ह धना होता तर राजलक्ष्मी च काय झालं हे जाणून घ्यायची खूप उत्सुकता लागून राहते

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!