छत्रपती संभाजी महाराजांना इसवी सन १६८९ मध्ये कसे पकडले याबद्दल आपल्यापैकी बऱ्याच इतिहासप्रेमी संभ्रमात आहेत. ती परिस्तिथी इतकी अनपेक्षित होती की नेमके काय घडले गेले, कुणी फितुरी केली हे दुर्देवाने कुणालाच ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे आज या लेखातून आपण या प्रसंगातील विविध ऐतिहासिक नोंदी तसेच त्या नोंदीवरून निघणारे निष्कर्ष माहीत करून घेऊयात.
संगमेश्वर हे अलकोंडा व वरुणा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या संगमापासून त्या नदीला शास्त्री नदी असे म्हणतात. पूर्वी संगमेश्वरापर्यंत लहान लहान मचवे वगैरे जाऊन जयगडापासून २० मैलपर्यंत नदीतून वाहतूक होत होती.
हे गाव पूर्वप्रसिद्ध असले तरी फार मोठे नव्हते. कोल्हापूर बाजूकडून येण्यास तिवरा, माल व कुडी अशा घाटातून वाटा होत्या.
संगमेश्वर हल्ली तालुक्याचे ठिकाण आहे. संगमेश्वर कोल्हापूरच्या वायव्येस सुमारे ७०-८० मैल व रत्नागिरीच्या पूर्वेस एकवीस मैल येईल.
कोल्हापुराहून पन्हाळा दहा मैल, पन्हाळ्याहून मलकापूर पंधरा मैल, मलकापुराहून खेळणा ऊर्फ विशाळगड वीस मैल व खेळण्याहुन संगमेश्वर पंचवीस मैल असून कोल्हापूर ते संगमेश्वर डोंगराळ व दाट जगली भाग आहे.
संभाजीराजे कलशच्या मदतीस अगदी थोडेच लोक बरोबर घेऊन गेले होते, ही खास औरंगजेबाचीच बातमी होती. अर्थात तो आपल्या थोड्याच लोकांनिशी परतला असला पाहिजे.
संभाजीराजे संगमेश्वरी केव्हा दाखल झाले त्या दिवसाचा उल्लेख नाही.
शकावलीतील नोंद अशी की,
‘वाघ वद्य, ७ शुक्रवासरी (१ फेब्रुवारी, १६८९) संभाजीराजे व कवि कलश रायगडास जावयास संगमेश्वरास आले असता सेक निजाम दौड करून येऊन उभयेतांस जीवंतच धरून नेले.
वरकड लोक रायगडास गेले. इ. स. १७११तील तकरीरीतही ‘संभाजीराजे रायेगडास चालिले. संगमेश्वराचे मुकामी शेक निजाम गनीम आला,’
हा उल्लेखही शकावलीतील नोंदीला दुजारा देणारा आहे.
त्यामुळेही शकावलीतील या नोंदीवरून व शिर्के प्रकरणातील तत्कालीन पुराव्यांवरून कलशाचे वास्तव्य, संभाजीराजे संगमेश्वरी येण्यापूर्वी ४-५ महिने तरी, पन्हाळा व खेळणा येथेच होते हे सिद्ध आहे. शिवाय शकावलीप्रमाणे ते दोघे व बरोबरीचे खास पथक रायगडास जाण्यासाठी निघाले होते.
संगमेश्वरी छावणीसाठी नव्हते हेही स्पष्ट आहे. रायगडास जाण्याची निकडही तत्कालीन परिस्थितीवरून स्पष्ट आहे. शहा अजम पुण्याच्या बाजूला जाऊन त्याने रायगडास वेढा दिला होता.
कोकणातील लहान-मोठे गडकोट घेतल्यावाचून मराठ्यांचे राज्य बुडविणे दुर्घट होते.
ज्याप्रमाणे विजापूर व गोवळकोंड्याच्या सुलतानानाच पकड़न व त्यांच्या राजधान्याच ताब्यात घेऊन दक्षिणी शाह्यांचा नाश केला तसाच पराक्रम संभाजीराजांच्या बाबतीत करण्याचा औरंगजेबाचा स्पष्ट मानस दिसतो.
डॉ. सेंट जॉन इंग्लंडच्या आपल्या राजास पाठविलेल्या १८ जुलै, १६८८ च्या पत्रात लिहितो :
‘राजाचे मदतनीसांचा काटा काढल्याने व त्यांचा समूळ नाश झाल्याने आपणास आता खास आपल्यावर होणाऱ्या औरंगजेबाच्या स्वारीला कसे तोंड देता येईल या चिंतेने राजा अगदी व्यग्र होऊन गेला होता…
मोगलाच्या छावणीतून… भवानीदास नावाचा एक
नागर ब्राह्मण येथे आला आहे. तो सांगतो की, औरंगजेब तर संभाजीला जिवंतच पकडण्याची भाषा बोलत आहे..’ तो पन्हाळ्याच्या लढ्यासाठी फारसा आतुर नव्हता. त्याला विजापूर, भागानगरसारखा रायगड घ्यावयाचा होता.
त्यामुळे
शहा अझम व तो विजापुराहून परस्परच त्या बाजूस जात होते. मासिरीतील नोंद स्पष्ट सांगते की, ‘बादशाहाने आपल्या मुलाच्या मदतीस जाण्यासाठी कूच करण्याचा निश्चय केला व तेथून निघण्यासाठी शुक्रवार १४ डिसेंबर, १६८८ हा दिवस मुक्रर केला.
इतकेच नव्हे तर औरंगजेब पश्चिमेस पन्हाळ्याकडे न वळता वायव्येकडे अकलूजला गेला. अकलूजहून तो बहादूरगडला (उत्तरेस = पांडेपेडगावला) १५ फेब्रुवारी, १६८९ पूर्वीच गेला. यावरून औरंगजेब पन्हाळ्याकडे न येता रायगडच्याच रोखाने जात आहे ही बातमी जानेवारी अखेरीस लागताच व मुकर्रबखानाचे सैन्य पन्हाळ्याबाबत फारशी हालचाल करीत नाही हे पाहून संभाजीराजे खेळण्याहून जलदीने निघाले आणि तेही रायगडास जाण्याच्याच बेताने.
मासिरीतील आणखी एक नोंद अशी आहे की, ‘रायगड यापूर्वीच मोगलाच्या ताब्यात जाऊन अब्दल खैरतखानाची किल्लेदार म्हणून नेमणूक झाली होती.’ इतकेच नव्हे तर संभाजीला कैद करण्यापूर्वीच इतिकद खानाला जो रायगड त्या नीचाचे घर व संपत्तीचे कोठार होता तो घेण्यासाठी पाठवले होते…’
ही परिस्थिती लक्षात घेतली तर शकावलीतील नोंदीतील १ फेब्रुवारी ही तारीख संभाजीच्या खेळण्याहून गमन करण्याकडे लावावयाची, का धरल्याकडे
लावावयाची, हा प्रश्न उत्पन्न होतो.