शिवमित्रांनो दरवर्षी गुढीपाडवा आला रे आला की आपल्यापैकी बरेच जण बोलतात की गुढीपाडवा साजरी करू नये कारण याच दिवशी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. (relation between Gudhipadava and Sambhaji Mahraj)
दर वर्षी छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी आणि गुढीपाडवा सण एकाच महिन्यात का येतात. आता याबद्दल प्रामुख्याने दोन प्रश्न/ गैरसमज आपल्यापैकी बऱ्याच लोकांना पडलेले असतात. ते खालीलप्रमाणे,
1. छत्रपती संभाजी महाराजांना याच दिवशी मारल्यानंतर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा शिरच्छेद करून डोके मिरवले त्याचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्यास सुरुवात झाली म्हणजे याच दिवसानंतर गुढीपाडवा सण सुरू झाला.
2. गुढीपाडवा हा मराठी अस्मितेचा सण असल्याने औरंगजेबाने मुद्दामून छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यासाठी हाच दिवस निवडला.

शिवमित्रांनो चला तर पहिल्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात खरंच छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिवसानंतर गुढीपाडवा सुरू झाला का.? तर याचे उत्तर आहे ‘नाही’ कारण खाली दिलेले अनेक ऐतिहासिक दाखले आहे, त्यात गुढीपाडवा या सणाचा उल्लेख खूप पूर्वीपासून आलेला आहे. ते आपण सविस्तर जाणून घेऊयात.
भारतीय संस्कृती कोश खंड क्रमांक ३ चैत्र शुद्ध प्रतिपदेला लोक वर्षप्रतिपदाही म्हणतात. याचदिवशी गुढीपाडवा हा सन साजरा केला जातो. याचदिवशी ब्रम्हदेवाने जगाची निर्मिती केली असे मानले जाते. अशाप्रकारे हिंदूंच्या नववर्ष्याच्या स्वागतासाठी गुढी उभी केली जाते. गुढी या शब्दाचा दूसरा अर्थ ध्वज अथवा पताका असाही होतो. शालीवहान म्हणजेच सातवाहनाची सत्ता ज्या भागात होती त्या भागात गुढीची प्रथा सुरू झाली.
मराठी विश्वकोश खंड क्रमांक ५ हा दिवस हिंदूच्या साडेतीन मुहूर्तार्पैकी एक मुहूर्त असून दक्षिण भारत आणि महाराष्ट्रात याचदिवशी शालिवाहन शकाला इ.स. ७८ मध्ये सुरुवात झाली असून शालिवाहन हा सातवाहनांचा अपभ्रंश असावा.परकीय शकावर शालिवाहनांनी विजय मिळविला तो दिवस आणि वसंत ऋतूचे आगमन म्हणूनही गुढी पाडवा साजरा केला जातो.
गुढी आणि शंकरपार्वती- डॉ. आ. ह. साळुंके कानडी भाषेतील गुढीचा उल्लेख -महात्मा बसवेश्वर ( कालखंड ११०५ ते ११६७ ) “ओडेयरू बंदडे गुडी तोरणव कट्टी ” याचा अर्थ जेष्ठांचे म्हणजेच शरणाचे आगमन होता गुढ्या उभारून तोरणे बांधा.
संत चोखामेळा ( कालखंड १२७० – १३५० ) – “टाळी वाजवावी, गुढी उभरावी, वाट ही चालावी पंढरीची “
संत ज्ञानेश्वर ( १२७५-१२९६ ) अध्याय ४, ६ आणि १४ – ” अवधर्माची अवधि तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जनाकरवी गुढी, सुखाची उभवि“
लिळा चरित्र – म्हाइंभट (१२७८- १३०० )- “चौक रंगमाळीका भरविलिया, गुढी उभविली “
संत एकनाथ ( १३३३ – १५९९ ) “उभावूणी सायुज्याची गुडी, परापरथडी पावले“
संत जनाबाई ( १२५८ -१३५० ) “राया प्राप्ती जाला पट, गुडी उभवि वाशिष्ठ “
तुकाराम (१६०८- १६५० ) “पुढे पाठविले गोविंदा गोपाळा, देऊनी चपळा, हाती गुढी “
शिवकालीन पत्रसार संग्रह खंड कृ. २ – केळकर आणि आपटे द.वि. शिवचरित्र कार्यालय पुणे, लेखांक १६२५, पृष्ठ कृ.४७७ “चैत्र शु. ८, शके १५९६, ४ एप्रिल १६७४ इंग्रजांचा दुभाषी व वकील नारायण शेणवी मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरला पत्र लिहितो की, मंगळवार दि. २४ मार्च रोजी रायरी ( रायगड ) ला पोहोचलो. त्याचदिवशी निराजी पंडिताची भेट घेण्याकरिता पाचाड गावी गेलो. तेव्हा निराजी गडावर होता असे समजले. मध्यंतरी निराजी पंडित पाडव्याकरिता ( २८मार्च १६७४ ) आपल्या घरी आला. दुसर्यादिवशी त्याने मला आपल्या बरोबर नेऊन एका प्रशस्त घरात माझी सरबराई केली. तेथे आणखी पाच दिवस राहिलो.”
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड कृमांक २० – वि. का. राजवाडे, लेखांक १७६, पृष्ठ कृमांक २३९ प्रा || वाई येथील कौल, एकूण कलम १ शके १५५२ मध्ये कार्तिक पौर्णिमे ग्रामस्त कसबे वाई यांनी ग्रहणकाली कडत जोसी को | मा|र ( मजकूर ) यास प्रतिवर्षी पासोडी एक व गहू गुढीयाचे पाडव्यास कुडव एक देऊ म्हनोन पत्र लेहून दिलहे यास वर्षे आज ता ||
वरील नोंदीवरून हेच सिद्ध होते कि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानापूर्वी सुमारे पाचशे वर्षांपासून गुढीपाडवा साजरा होत होता. त्यामुळे पहिली अफवा हि खोटी अफवाच आहे हे सिद्ध होते. त्यामुळे इथून पुढे कुणी असे बोलले तर त्याला तिथेच हे खोटे असल्याचे सांगत चला जेणेकरून इतिहासाचा अपमान होणार नाही.
आता दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात,
ऐतिहासिक नोंदीमध्ये आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूची तारीख शके १६१० – फाल्गुन वद्य ३० म्हणजेच ११ मार्च १६८९ अशी दिसते. ज्युलियन 11 मार्च 1689 म्हणजेच ग्रेगोरियन 21 मार्च 1689. दोन्हीही एकच दिवस.

आता आपण पाहुयात कि १६८९ मध्ये गुढीपाडव्याचा मुहूर्त केव्हा होता ? तर शिवमित्रांनो १६८९ मध्ये २२ मार्चला गुढीपाडव्याचा मुहूर्त होता.दुसरे म्हणजे राजांची हत्या पाडव्याचा आदल्या रात्री म्हणजेच अमावास्येला झाल्यानंतर दुसर्या दिवशी असे कोणते दळणवळनाचे साधन होते की एका रात्रीत गुढी उभी करण्याचा संदेश महाराष्ट्रातल्या कानाकोपर्यात गेला? त्यामुळे हे दोन्ही दिवस वेगवेगळे असल्याचे आपल्या लक्षात यईल. दुसरी अफवा पण खोटी अफवाच होती हे यावरून सिद्ध होते.